Friday, September 11, 2020

फक्त निर्मळ मनाचा...

 

अक्षरांना स्पर्श असावा

मोरपिसाचा, हंसपिसाचा किंवा अगदी राजहंस पिसाचा

 

शब्दांना सुवास असावा

गुलाबाचा, चाफ्याचा किंवा अगदी छोट्याश्या बकुळीचा

 

वाक्यांना निर्बंध असावा

स्वच्छ, सत्शील विचारांचा आणि निर्मळ मनाचा

फक्त निर्मळ मनाचा...

 

© मोहिनीराज भावे

Sunday, August 30, 2020

श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन


नमस्कार! चित्रामृत प्रस्तुत, ‘श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन’ ही मालिका आपल्यापूढे सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या मालिकेत आम्ही आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘वचनामृत’ स्मृती-ग्रंथाचं वाचन सादर करत आहोत.

उपनिषदांमधील अत्युच्च ज्ञानाला प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवता येईल हे आपल्या-सारख्या सामान्य मनुष्यांना शिकवण्यासाठीच भगवंत वारंवार मनुष्यरुपात अवतरीत होत असतात. श्रीरामकृष्णांच जीवन म्हणजे साक्षात ही उपनिषदेच. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या अनंत पैलूचं दर्शन होउ शकतं. ‘वचनामृत’ सारखे ग्रंथ आपल्याला श्रीरामकृष्णांच्या अभूतपूर्व जीवनातील घडामोडींची अगदी जवळून ओळख घडवून आणतात. या ग्रंथाबद्दल खरं म्हणजे जितकं बोलावं तितकं कमीच.

‘महेंद्रनाथ गुप्त’ यांनी श्रीरामकृष्णांशी झालेल्या भेटीना आपल्या दैनंदिनीत शब्दबद्ध केलं. ‘श्री म’ नावानी त्यांनी लिहिलेला मुळ बंगाली ग्रंथ म्हणजे, ‘श्रीश्रीरामकृष्णकथामृत’. पुढे कालांतराने त्याचे विविध भाषांमधे अनुवाद झाले. स्वामी शिवतत्वानंद यांनी मुळ बंगालीवरून केलेला मराठी अनुवाद म्हणजेच ‘श्रीरामकृष्ण वचनामृत’. हा मराठी अनुवाद श्रीरामकृष्ण मठ नागपूर यांच्यातर्फे प्रकाशित झाला आहे. या मालिकेतील वाचनासाठी आम्ही वापरत असलेली आवृत्ती तेरावी असून ती सन २००६ मधे प्रकाशित झाली आहे.

हे वाचन मोहिनीराज भावे यांच्या आवाजात सादर होत आहे. ऐकताना सोपं जावं म्हणून काही किरकोळ बदल केले आहेत. खाली या ग्रंथातील क्रमाप्रमाणे वाचनाच्या ऑडिओ-लिंक्स मांडल्या आहेत. त्या ऐकण्यासाठी त्यावरील ‘प्ले’ बटण दाबा. आम्हाला खात्री आहे की हा उपक्रम आपल्या सर्वांना खूप आवडेल. आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

चला तर मग, या मधूर आणि अद्भूत स्मृतीग्रंथाचा आस्वाद घेउया.


श्रीरामकृष्ण वचनामृत

संपूर्ण प्ले-लिस्ट

*दर आठवड्याला नवीन अध्यायांची भर!


अध्याय ००१

प्रथम दर्शन | कर्मत्यागाचा समय (२६ फेब्रुवारी १८८२)




अध्याय ००२- भाग ०१

द्वितीय दर्शन आणि गुरुशिष्य संवाद | गृहस्थ व पित्याचे कर्तव्य (२७ फेब्रुवारी १८८२)




Visit Chitramrit for more details...

Tuesday, June 16, 2020

पालखी

आजच पालखीचे पुण्यात आगमन झाले असते आणि उद्याचा मुक्काम.

मी दर वर्षी, पालखीचे दर्शन घ्यायला फर्ग्युसन रस्त्यावर जातो. लहापणापासूनच तिथे पालखीचे दर्शन घेतले आहे. तुकाराम महाराज पादुका मंदिरासमोर, ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरासमोर आणि शेतकी महाविद्यालय चौक. या भागात प्रचंड उत्साह असतो.

शेतकी महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, बी एम सी सी, मराठवाडा, सिंबायोसिस, या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक असा वर्ग, आणि वडार वाडी, गोखले नगर, पोलीस लाईन, आपटे रोड मॉडेल कॉलनी, अशा भागातला गरीब, उच्चभ्रू वर्ग, सगळे वेगवेगळ्या रंगाचे, रूपाचे, वर्णाचे, जाती धर्माचे तिथे एकत्र येतात.

माझा भाचासुद्धा ३ वर्षाचा असल्यापासून माझ्याबरोबर येतो. आता ६ वर्षाचा आहे.
मी स्वतः ६ वर्षाचा होतो तेव्हापासून पालखीचं दर्शन घेतले आहे.

मागील ३४-३५ वर्षातले हे पहिले वर्ष आहे जेव्हा हा सोहळाच  अनुभवता येणार नाही. घरीच असलो तरी, मन फर्ग्युसन रोड वर आहे. कुठून भीमसेनजींचा आवाज येतोय का ते शोधत आहे. कारण पालखी आणि भीमसेनजींची अभंगवाणी हि खरच अभंग आहे.

उद्या आपल्या सर्वांबरोबरच, पुण्यातील आणि परिसरातील वृत्तपत्राचे कागद, शाई, मशीन सगळेच पालखीची बातमी आणि फोटो यांची वाट पाहत असतील. उद्या त्यांची पाने कोरीच असतील. इतर बातम्या असल्या तरी पालखीची बातमी मात्र हरवलेली असेल. त्यामुळे ती कोरीच नाही का?

पुढच्या दोन दिवसांचे अबाल वृद्धांचे पालखी बरोबरचे, डोक्यावरच्या तुळशीचे, कपाळावर चंदन लावलेले हसरे चेहरे यावर्षी आपापल्या घरीच असतील.

- मोहिनीराज भावे
१६-०६-२०२०

Sunday, June 14, 2020

ना तब मौसम था बारिश का





जो मिला वो समेटते गए
अपना घर बनाते गए


ना तब मौसम था बारिश का
और न हुआ करती थी बेमौसम बारिश



जब बारिश हुई तो पता चला
समेटा था वो मिट्टी थी


स्वभाव था उसका पानी में घुल जाना
घुलना था सो घुल गई, 

पानी के साथ बह गई

बारिश जो थी वो थम गई
उसे जाना था वो चली गई


जाते जाते ले गई
पोटली कुछ सपनोकी और कुछ अरमानों की



हम क्या करते, 
न कोई आसरा था, 

न था कोई सहारा 

जो जाना था वो चला गया
वोभी कहा अपना था


जोभी था वो पराया था
न कुछ लेकर आए थे,
न कुछ लेकर जायेंगे




फिर उठे खड़े हुए
क्या मिलता हैं वो टटोलने लगे


जो मिला वो समेटते गए
अपना घर बनाते गए


ना तब मौसम था बारिश का
और न हुआ करती थी बेमौसम बारिश


- मोहिनीराज भावे


Wednesday, November 20, 2019

Project Management : Part-05: Project Requirement


मित्रांनो समजा आपण एखादा मोठा ग्रुप घेऊन फिरायला निघालो आहोत. मग आपण काय करतो तर ज्या ठिकाणी जायचे आहे त्याठिकाणची सगळी माहिती नोंद करून ठेवतो. त्याचबरोबर प्रवासाला लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करणारी एक लिस्ट तयार करतो. या लिस्टमध्ये प्रवासाची तिकिटे, राहण्याच्या ठिकाणाचे बुकिंग केले असेल किंवा करायचे असेल तर त्याची नोंद, कधी, कोणत्या दिवशी, किती वाजता, कुठे जायचे, तिथे काय बघायचे, याची जुजबी नोंद. तसेच निघताना आपल्या ग्रुपमधील कोणती व्यक्ती कशी पोहोचेल आणि सगळ्यांचा एकच पिकअप पॉइंट कोणता असेल या सर्व गोष्टींची नोंद आपण करतोच. त्याचबरोबर आपण प्रवासामध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या सामानाची यादीदेखील करतो. जर आपण अशाप्रकारे कोणतीही तयारी न करता प्रवास सुरू केला तर आपल्याला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

अगदी अशाच प्रकारे एखादे प्रोजेक्ट सुरू करताना त्या प्रोजेक्टमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टींची यादी तयार करणे म्हणजे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट.

आता हेच बघा ना एखादे प्रोजेक्ट सुरू करायचे असेल तर, क्लायंटला नक्की काय हवे आहे याच्या नोंदी करून घेणे, क्लायंट हे प्रोजेक्ट कोणासाठी करत आहे म्हणजे टारगेट ऑडियन्स कोण आहे याची नोंद करून घेणे, टारगेट ऑडियन्स च्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या नोंदी करणे, आपल्या प्रोजेक्टमधून आपल्याला काय साध्य करायचे आहे याची नोंद करणे म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा गोल काय आहे हे नोंद करून ठेवणे, तसेच या रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ लागेल त्यांची कुशलता काय असेल, त्यासाठी कोणत्या प्रकारचे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर लागेल, ते कधी लागेल याच्या नोंदी करणे हे हितकारक असते यामुळे आपण प्रोजेक्टच्या मध्ये येणाऱ्या सर्व बाबींचा योग्य तो विचार करतो आणि त्याप्रमाणे तयार होऊनच आपल्या प्रोजेक्टच्या प्रवासाला सुरुवात करतो. 

Sunday, November 10, 2019

Project Management : Part-04: Cone of Uncertainty- Project Stakeholders

प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स म्हणजे प्रत्येक ज्यांना प्रोजेक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे अशा व्यक्ती. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अशी अधिकारी व्यक्ती खूप महत्वाची असते. अशी व्यक्ती फक्त क्लाएंट असते असे नाही तर ती तुमच्या कंपनीची एखादी उच्च पदावरील व्यक्ती असेल अथवा प्रोजेक्ट साठी काम करणारी एखादी कन्सल्टन्ट अथवा अन्य कोणी. हि एक व्यक्ती किंवा अशा अनेक व्यक्ती तुम्ही संचालित करत असलेल्या प्रोजेक्ट संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेणार असते जसे कि;
१. रिक्वायरमेंट
२. टाइमलाईन
३. कामाचे स्वरूप
४. कॉस्ट
५. मनुष्यबळ
६. तुम्ही केलेले काम योग्य आहे कि अयोग्य

आता अशा अनेक व्यक्ती असतात तेव्हा "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" हा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. या सर्व व्यक्ती आणि त्यांची मते जाणून घेऊन काम करणे हे जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे कोणत्या व्यक्तीस कोणत्या प्रकारचा सर्वोच्च अधिकार आहे हे माहित करून घेणे.

समजा तुमच्या घरी पार्टी आहे आणि पाहुण्यांसाठी तुम्ही एखादा पदार्थ बनवला आणि तो घरातील ४ व्यक्तींना खायला दिला तर जशी तुम्हाला वेगवेगळी प्रतिक्रिया मिळेल जसे कि गोड पदार्थ असेल तर खूपच गोड आहे  (डाएट करणारी व्यक्ती ) किंवा थोडी साखर अजून हवी होती (डाएट न करणारी व्यक्ती ) अशा दोन विरुद्ध प्रतिक्रिया तुम्हाला मिळू शकतात. यातील कोणाची प्रतिक्रिया तुम्ही फायनल धराल? ज्या व्यक्तीला स्वयंपाकातील जास्त कळते तिला. बरोबर ना? अगदी तसेच हे आहे.


तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट नेहमी तयार राहील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने प्रोजेक्ट संदर्भात प्रश्न विचारला तर तुम्ही हा रिपोर्ट बघून लगेच उत्तर देऊ शकाल. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी काही ऍप्लिकेशन्स तुम्ही वापरू शकता (Microsoft Project, Asana, Teamwork, ProofHub, Jira, Trello, etc)

प्रोजेक्टचे स्टेटस नेहमी अपडेट करा आणि सगळ्यांबरोबर विशिष्ठ कालावधीनंतर शेअर करीत रहा. तुम्ही स्वतः स्टेटस शेअर केल्याने तुम्हाला तुमची कार्यक्षमता वेगळी सिद्ध करण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारे तुम्ही प्रोजेक्टमध्ये काही संकटे आली तर आधीच त्यांचा प्रतिकार करण्यास सगळ्यांना बरोबर घेऊन मार्ग काढू शकाल. 

Monday, November 4, 2019

Project Management: Part-03: Uncertainty

मित्रांनो, कोणत्याही प्रोजेक्टच्या आधी त्या प्रोजेक्टबद्दल खूप कमी माहिती असते. म्हणजे;
१. प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स (Project Stakeholders)
२. प्रोजेक्ट रिक्वायरमेंट (Project Requirement)
३. प्रोजेक्ट टाइमलाईन (Project Timeline)
४. प्रोजेक्ट टीम (Project Team)
५. प्रोजेक्टमधील चॅलेंजेस (Challenges in Project)
६. प्रोजेक्टमधील चॅलेंजेसची सोल्युशन्स (Solutions of Challenges)

आता एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी माहित होणं अवघड आहे. कधी प्रोजेक्ट संपत आल्यावर स्टेकहोल्डर्स नक्की कोण हे समजते तर कधी त्यांची संख्या जास्त असते. प्रत्येकाचे मन सांभाळणे अवघड गोष्ट आहे. कारण "मन" हे कोणत्याही तराजूमध्ये तोलता येत नाही कि अग्रीमेंटमध्ये बांधून ठेवता येत नाही.

सगळ्यात क्लिष्ट असते ते म्हणजे क्लिअर रिक्वायरमेंट प्राप्त होणे. अनेकदा क्लाएंटला काय हवे आहे हे त्यांना स्वतःलाच माहित नसते तर कधी ते आपल्याला नीट कळत नसते. यामध्ये महत्वाचे असते ते म्हणजे संवाद आणि संवादाची भाषा. भाषा म्हणजे इंग्रजी, फ्रेंच वगैरे नव्हे तर आपली तांत्रिक (technical) आणि त्यांची अतांत्रिक (non -technical).

टाइमलाईन तर अशी गोष्ट आहे जी क्लाएंट आणि आपली कधीच जुळत नसते. एखादे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने चालू आहे असा अहवाल आपण दिला रे दिला कि क्लाएंट ते लवकर पूर्ण करायला सांगतो. एखादा प्रोजेक्ट काही अडचणीतून जात असेल तर क्लाएंट वेळेच्या बंधनाची आठवण करून देतो. एखाद्या प्रोजेक्ट मध्ये क्लाएंट कडून काही गोष्टींची पूर्तता व्हायची असेल तर टाइमलाईन बदलून वेळ वाढवून मिळतो. टाइमलाईन न जुळण्याची असंख्य करणे असतात.

प्रोजेक्ट टीम हा विषय नाजूक असतो. प्रोजेक्ट रिक्वायरमेंट नीट माहित नसल्यास टीम काय असायला पाहिजे हे ठरवता येत नाही. टीम काय हवी हे कळले तर ती उपलब्ध नसते. उपलब्ध असल्यास कोणाला सुट्टी हवी असते तर कोणाला ट्रेंनिंग. टाइमलाईन आणि टीमचे एक वेगळेच नाते असते. जो प्लॅन आपण टीमला विचारून करतो तो योग्य रीतीने पुढे न जाण्यास अनेक अचानक गोष्टी घडतात तर जो प्लॅन आपण स्वतः करतो त्यात अडचण काही असू, आपण तो न विचारता केला हे एकमेव कारण असते.

प्रोजेक्ट मधील चॅलेंजेस आणि त्यांची सोल्युशन्स हे आपण गृहीत धरल्यापेक्षा काहीतरी वेगळेच रसायन असते.
आणि या सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतः च  जर नीट प्लॅन करून ते पूर्ण करून घेऊ शकत नसलो तर इतरांना दोष तो काय द्यायचा?

या सगळ्या माहित नसलेल्या किंवा कमी माहित असलेल्या गोष्टी म्हणजे अनसर्टनीटी (Uncertainty). 

Monday, October 28, 2019

Project Management: Part-02: Initial Preparation

आता तुमच्याकडील कोणत्याही एका प्रोजेक्ट चा विचार करा. जेवढा वेळ हे प्रोजेक्ट पूर्ण करायला लागेल तेवढी उत्कंठा वाढत जाते, खर्च वाढतो, प्लॅनचा अंदाज आणि सत्यता यातला फरक समजायला लागतो, आणि काही वेळा परिश्रम वाया जातात. यालाच 'कोन ऑफ अनसर्टनीटी' (Cone of Uncertainty) म्हणतात.

आता आपण आपल्या हत्तीचेच उदाहरण बघू. अक्खा हत्ती जर आपण मुठीत घ्यायचे  म्हणलो तर शक्य आहे का? नाही ना? मग तसाच अक्खा प्रोजेक्ट एकाच वेळी करायला गेलो तर काय होईल? मुळात आधी हत्तीचा आकार आणि मुठीचा आकार याचा मेळ बसणार नाही आणि नंतर उचलणे तर लांबच राहील.

आता आपण माकडांचे उदाहरण बघू, हि माकडं त्यांच्या आडदांडपणाने एखाद्या फळबागेत घुसतात प्रचंड हैदोस घालतात, फांद्या तोडतात, फळे तोडतात पाने फुले वेळी सगळे काही तोडतात. ती त्यांच्याच मस्तीत असतात. याने होते काय कि बागेचा मालक त्यांना हुसकावून लावतो. पोटात किती जाते?

या उलट पोपट, कोकीळ असे पक्षी फक्त खाण्यालायक फळे खातात. बागेचा मालक असे पक्षी आपल्या बागेत यावेत त्यांनी सुमधुर गुंजन करावे असे म्हणत त्यांना योग्य असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. हे पक्षी कायम फळांचा आस्वाद घेतात कारण ते योग्य तेवढेच घेतात आणि सगळे एकदम खायचा प्रयत्न करीत नाहीत.

आता आपण अजगराच्या खाण्याचा विचार करू. एका वेळेस जो प्राणी समोर येईल तो हळू हळू चावून न खाता तो पूर्ण प्राणी घाई घाईत गिळून टाकतो. आणि मग एकाच जागी सुस्त होऊन पडून राहतो. या सुस्तावलेल्या काळातच त्याच्यावर एखादा दुसरा प्राणी हल्ला करतो आणि हा प्रतिकार न करताच बळी पडतो.

मित्रांनो अगदी तसेच आपण जर क्लाएन्टच्या घाई मुळे किंवा इतर काही कारणामुळे  पूर्ण प्रोजेक्ट एकाच वेळेस करायला गेलो तर आपण तो शेवटी घाई गडबडीत पूर्ण करतो. यामुळे होते काय कि झालेल्या चुका पुढे आपण काही दिवस निस्तरत बसतो आणि क्लाएन्टच्या किंवा इतरांच्या आरोपांचे बळी ठरतो. प्रोजेक्ट एक तर आपल्या हातून जाते नाहीतर कंपनीच्या. त्यामुळे आपण थोडे थोडे खाल्ले पाहिजे. प्रोजेक्टच्या प्रत्येक पायरीचा विचार करायला हवा, उपलब्ध टीमच्या कौशल्यांचा विचार करायला हवा, उपलब्ध आर्थिक स्रोतांचा विचार करायला हवा आणि मग प्रोजेक्टची नीट आखणी / मांडणी करून तू सुरु करायला हवा. यात आधी थोडा वेळ जाईल पण योग्य आखणी आणि प्रत्येक पायरी पूर्ण झाल्यावर क्लाएंट बरोबर शेअर केल्यास सगळेच आनंदी राहतील. यात मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे दार काही दिवसांनी या आराखड्याचा रिव्ह्यू. 

Project Management: Part-01: Introduction



मित्रांनो, नमस्कार!
प्रोजेक्ट प्लँनिंग (Project Planning) म्हणजे खरंतर एक सोपी गोष्ट. हो खरंच सोप्प आहे. तुम्ही अनेकदा वॉटरफ़ॉल मॉडेल (waterfall ), कायझन (kaizen ), अजाईल (agile), इत्यादी शब्द ऐकले असतील. त्यातूनच या सर्व प्रकारचे सर्टिफिकेशन आणि त्यांची क्लिष्टता, त्यासाठीचे मापदंड, मोठाल्या फीज हे ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल. हो खरंच हे सर्व अवघड आहे. पण मग मी सोपं का म्हणतोय? कारण शेवटी या सगळ्या मधल्या थिअरीज आपल्याला आपल्याच कामात वापरायच्या आहेत. आपलं काम जर आपल्याला नीट येत असेल म्हणजे आपल्या प्रत्येकाला बरं का. तर आपल्या टीमला जर आपापलं काम नीट येत असेल तर या सर्व थिअरीज एकदम सोप्प्या आहेत. म्हणजे प्रोजेक्ट प्लँनिंग एकदम सोप्प आहे. अजूनही अवघड वाटत आहे?
चला आपण हे मिळून सोप्प करूया. आपण काही आपल्याला उपयुक्त अशा गोष्टी सिरीज मध्ये करणार आहोत. एकदम नाही हं. कारण प्लँनिंग मधल्या अनेक संकल्पना मिळून एक हत्ती आहे. आता खराखुरा हत्ती कोणी अक्खा मुठीत घेऊ शकेल का? नाही ना ? आपणही तसेच या हत्तीच्या कधी सोंडेला स्पर्श करू तर कधी कानाला. असे करत आपण हा संपूर्ण हत्ती जाणून घेणार आहोत. जेवढे जाणून घेऊ तेवढे थोडेच.



Hello Friends,
Project planning is a simple thing! What? Do you think it's not? It's truly easy. Why am I saying so?

You must have heard about the waterfall model, kaizen, agile, etc. You must have also heard about PMP, Agile, etc project management certifications along with their measurement systems, fees for courses or certifications, credit systems. Or you have experienced it? hmm! then project management or planning is really difficult.

Then why I am saying it's easy? Am.. because all these are theories/practices/processes, we will be using in our work which we are doing regularly. If we know our work exactly ("we" mean the team) then these theories are easy.

Let's make it easy together. We will be doing some useful things in this series...no no not only one.. we will do many things. Why? because many concepts together become a huge elephant. So, can you grab an elephant by your hand? definitely no. We will touch its different body parts one by one.
So let's start...

Sunday, April 14, 2019

ओळख




“सचिन, अरे उद्याची तयारी कुठपर्यंत आली?”
“हो भाऊ झालीच”
“हं. बरं तू आणि बाकीची पोरं जेवलात न
पोटभर?”
“हो भाऊ जेवलो आम्ही”
“बरं मग. उद्या सकाळी लवकर कामाला लागा.
जे लोक बाहेर गावाहून येणार आहेत त्यांच्या चहा नाष्ट्याची सोय, जेवणाची सोय नीट करा. लोक चार वाजल्यापासून यायला लागतील, त्यांना पाणी वगैरे द्या. आपले लोक वेगवेगळ्या ठिकाणी मदतीला असुदेत. आणि काही लागल तर मला डायरेक्ट फोन कर. मी सहा वाजेपर्यंत येईन तोपर्यंत मैदान पूर्ण भरण्याची जबाबदारी तुझी. या सभेचा तू प्रमुख आहेस. चल ठेवतो आता. गुड नाईट!”

“गुड नाईट भाऊ!”


त्याने घड्याळात पाहिलं रात्रीचे अडीच वाजले होते. एवढ्या रात्री भाउंनी स्वतः आपल्याला फोन केला या जाणिवेनेच त्याची छाती अभिमानाने फुलली.
आपल्याला एक “नवी ओळख” मिळाली आहे असं त्याला वाटलं.

“चला रे आता झोपूया”, असं म्हणून तो स्वतःही स्टेजवरच्या एका कोपऱ्यात पहुडला.

सकाळी सहा वाजताच तो उठला. बाकीच्यांनाही उठवलं. जवळच्याच एका टपरीवर जाऊन सगळ्यांनी चहा घेतला. स्टेजच काम तसं होतच आल होतं. फुलांच्या माळांनी आता स्टेज सजवायचे होतं, बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांच्या चहा-नाष्ट्याची सोय बघायची होती, स्टेजवरच्या मान्यवरांचे यथासांग स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या माणसांना नेमायचे होते, त्यानंतर दुपारच्या जेवणाची सोय बघायची होती…

तो सगळं मन लावून करत होता. भाऊंनी या सभेची पूर्ण जबाबदारी आपल्यावर दिली आहे. आपणच या सभेचे प्रमुख नियोजक आहोत, असं भाऊ म्हणाले आहेत. म्हणूनच तर रात्री एवढ्या उशिरा भाऊंनी स्वतः आपल्याला फोन केला. आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी भाऊंनी दिली आहे तर आपण ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे आणि भाऊंचा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे.

सतत वाजणारा फोन, येणाऱ्या लोकांचं स्वागत, त्यांची उठबस करता करता दिवस कसा संपला आणि संध्याकाळ कधी झाली हे त्याला कळलच नाही. आजची निवडणुकीची ही शेवटची सभा होती. परवा मतदान होते आणि त्यामुळेच या सभेला विशेष महत्त्व होते. स्टेज छान सजले होते. हवी तशी गर्दी जमली होती. मैदान पूर्ण भरले होते. आलेले मान्यवर वक्ते त्यांची त्यांची भाषणे करत होते. सगळ्यांना आतुरता होती ती भाऊंची.

साडेसहा झाले आणि भाऊ आले. भाऊंसाठी त्याने खास ढोल पथक बोलावले होते. भाऊ आल्या आल्या पथकाने वाजवायला सुरुवात केली. गर्दीतून त्याच्याच माणसांनी आधी आणि मग गर्दीने भाऊंच्या नावाचा जयघोष केला. भाऊ जिंकणार याची खात्रीच जमलेली गर्दी देत होती. भाऊंनी गर्दी पाहून सचिनच्या पाठीवर थाप मारली “भले शाब्बास! छान गर्दी जमली आहे” अस ते सचिनला म्हणाले. सचिनला ते पूर्ण मैदानच आपल्या  मुठीत आल्यासारखे वाटले. थोड्यावेळाने भाऊ भाषणाला उभे राहिले. साधारण तास-दीड तास त्यांचे भाषण चालू होतं. भाषण झालं तसं सर्व मान्यवरांनी भाऊंच अभिनंदन केलं. भाऊ त्यांच्या गाडीकडे निघाले. सचिन त्यांना भेटायला गेला आणि भाऊंच्या अंगरक्षकांनी त्याला बाजूला केलं. भाऊ हसले. गाडीत बसले. सगळ्यांना हात केला आणि निघून गेले.

थोड्याच वेळात संपूर्ण मैदान रिकामे झाले. आता सचिन आणि त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते, मांडव वाले एवढेच काय ते तिथे राहिले. सभा तर यशस्वी झाली होती म्हणून भाऊंशी बोलावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या यासाठी त्यांन भाऊंना फोन केला. रिंग वाजत राहिली पण कोणीही फोन उचलला नाही. भाऊ कामात असतील म्हणून त्याने फोन ठेवून दिला. सगळी आवराआवर झाली आणि त्याचबरोबर ते सर्व भुकेने कासावीस झाले. रोज “जेवलात का?” म्हणून फोन करणाऱ्या भाऊंचा आज फोन आला नाही. ज्या हॉटेलात सोय केली होती तिथे गेल्यावर कळाले जेवणाची सोय कालपर्यंत होती. शेवटी तो आणि बाकीचे कार्यकर्ते एका वडापावच्या गाडीवर गेले आणि तिथे वडापाव खात होते.

पुन्हा एकदा भाऊंना फोन लावून बघावं म्हणून त्याने फोन लावला.
फोन उचलला गेला. भाऊंचा असिस्टंट बोलत होता,
“काय रे एवढ्या रात्री कशाला फोन केलास?” 
“अंं... ते.., भाऊंशी बोलायचं होतं.”
“ही काय वेळ आहे का भाऊंशी बोलायची? भाऊ झोपलेत. उद्या फोन कर. चल ठेव आता.”
फोन कट झाला होता.

त्याला लक्षात आलं होतं आपलं काम झालंय. भाऊ पुन्हा पाच वर्षांसाठी झोपलेत. आपण पुन्हा एकदा कार्यकर्ते आहोत. कोणीही आपल्याला आता ओळखत नाही. आपली “ओळख” प्रचाराच्या शेवटच्या क्षणीच संपली आहे.

सकाळपासून आईचा चार-पाच वेळा फोन आला होता. कामाच्या गडबडीत त्याने तो कट केला होता. त्याने आईला फोन लावला. फोन लागला आणि पलीकडून आवाज आला, “सचिन, अरे बाळा जेवलास का रे?”



(यातील प्रसंग व सर्व पात्रे काल्पनिक असून, त्यांचा कोणत्याही अस्सल भाऊ, ताई, दादा, साहेब इत्यादी लोकांशी संबंध नाही. कृपया ओढूनताणून जोडूही नये. असे प्रसंग फक्त राजकारणातच येतात असे नाही तर कुठेही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात.)





Saturday, April 13, 2019

सामान्य

५ वाजले होते. सुरेशची गाडी सिग्नलला आली. लाल सिग्नल होता. त्याने गाडी थांबवली. सकाळी ७ ला घर सोडलं होते त्याने. चहा आणि ४ ग्लुकोजची बिस्किटं खाऊन. त्याच्या घरापासून त्याच ऑफिस गाठायला त्याला एक-दीड तास लागायचा. ट्रॅफिकमधून वात काढत ऑफिसला पोहोचलं कि तिथून पुढे आज कुठे जायचंय हे कळायचं. मार्केटींगचा जॉब होता त्याचा. शहरातील जो भाग पिंजून काढायचाय त्याच नाव आणि तिथले वेगवेगळे पत्ते मिळाले कि पुन्हा गाडीला किक मारायची आणि निघायचं. सगळ्या पत्त्यांवर जाऊन काम झालं कि ऑफिसला एक फोन करून सांगायचं आणि डायरेक्ट घरी.

आज नेमकं लांबचा भाग मिळाला होता. शहराच्या दुसऱ्या टोकाचा. सुरेश त्याच्या कामात एकदम तरबेज होता. त्याचं आजचं काम लवकर आटोपलं होते. १० पत्त्यांपैकी २ पत्त्यांवर कुलूप होते. पण तरीही तो आज खूप थकला होता. सूर्य आज सकाळपासून आग ओकत होता. कितीही पाणी प्यायलं तरीही तहान भागल्यासारख वाटत नव्हत. रस्त्यावरची वाहनांची वर्दळ, त्यांचे होर्नचे आवाज, पोटातली भूक या सगळ्याने तो जास्तच वैतागला होता. घामाने शर्ट पूर्ण ओला झाला होता. महिना अखेरीमुळे खिशात पैसेपण नव्हते. अचानक एका आवाजाने त्याच विचारचक्र तुटलं. "बंधुंनो आणि भगिनींनो, आज संध्याकाळी ठीक ७ वाजता आपले आमदार साहेब श्री..... यांची सभा याच ठिकाणी होणार आहे....". सकाळपासून उन्हात फिरून वैतागलेल्या त्याच्या मनाचा ताबा आता रागाने घेतला. "सभा घेणार म्हणे, निवडणूक आली कि हे भेटायला येणार. चांगली नोकरी देऊ, घर देऊ, सगळ्या वस्तू स्वस्त करू म्हणणार आणि नंतर हे सगळे गायब होणार." त्याची कानशील गरम झाली, त्याला वाटलं आत्ताच सभेच्या ठिकाणी जावं आणि ....

एकदम गडगडाट झाला आणि त्याच्या अंगावर थेंब पडू लागले. पावसाचे. होय पावसाचे. उन्हाळ्यात एकदम कसा हा पाऊस? तो विचारच करत होता पण मागून हॉर्न वाजू लागले. सिग्नल हिरवा झाला होता. पण त्याला निघावे वाटत नव्हते. त्याने गाडी बाजूला घेतली. पावसाचे थेंब अंगावर झेलत तो तिथेच बाजूला उभा राहिला. पावसाचा प्रत्येक थेंब जसा सामान्य असतो जिथे पडेल तिथला होतो. त्याच स्वतः च असं काहीच विशेष नसतं. पण तरीही जर उष्ण मातीवर पडला तर एक मंद दरवळ पसरतो. तसच त्याच्याही उष्ण विचारांवर ते थेंब पडले आणि मघा जे विचार डोक्यात होते ते विरून तोहि त्या पावसाशी एकरूप झाला होता. पावसाच्या थेंबासारखा. सामान्य.

Thursday, July 5, 2018

तू असाच कोसळत रहा...

तू असाच कोसळत रहा
कोसळता कोसळता पुसून टाक
मळभ झाड वेलींच्या पानांवरचे आणि आमच्या मनांवरचे

तू असाच कोसळत रहा
कोसळता कोसळता भरून टाक
डोह छोट्या मोठ्या बांधांवरचे आणि आमच्या ऊर्जेचे

तू असाच कोसळत रहा....
तू असाच कोसळत रहा....

Wednesday, May 31, 2017

विशाल वृक्ष, मी आणि अथांग सागर




विशाल वृक्ष, मी आणि अथांग सागर

द्वंद्व मनाचे की भविष्याचा जागर


एक खळाळता फेसाळता सागर


की अनेक सळसळते चंचलते निर्झर


विस्तिर्ण झेपावती वेडीवाकडी फांदी


की सक्षम आधाराची विस्तारित नांदी 


विशाल वृक्ष, मी आणि अथांग सागर


द्वंद्व मनाचे की भविष्याचा जागर!




-मोहिनीराज भावे





Thursday, March 9, 2017

महिला दिन


काल "जागतिक महिला दिन" होता, मी विचार केला, "चला आज आईला थोडा संध्याकाळच्या कामातून सुट्टी देऊ." तिला विचारले, काय करूया? जाऊया का कुठे बाहेर? तिनी पण बहुतेक विचार केला, चला आज कधी नव्हे ते मुलगा लवकर घरी आलाय तर फिरून येऊ. ती म्हणाली, "चल आज भेळ खाऊ." मी पण लगेच तयार झालो.

आम्ही छान तयार झालो, चारचाकीत बसलो आणि निघालो. संध्याकाळची वेळ असल्यानं रस्ता जरा धीम्या गतीन पुढे सरकत होता. काय म्हणालात? रस्ता कसा सरकेल? या पुण्यात तेही वारज्यात मग कळेल. असो तर आमचा रस्ता हळू हळू पुढे सरकत होता आणि आम्ही आजूबाजूला पाहत होतो. काही बसेस खास महिला दिनानिमित्त सजवल्या होत्या. अगदी हार, तोरणे बांधली होती. या फक्त महिला स्पेशल बस होत्या. मी अगदी कुतूहलान ३-४ वेळा या बसेस कडे पाहिले, मी शोधात होतो महिला वाहक आणि चालक. ते काही दिसले नाहीत. काही ठिकाणी आहेत असे ऐकले होते. असो. तर आम्ही तिथून सरकत पुढे गेलो. सिंहगड रोडवर.

एका महिलांनी चालवलेल्या खाद्यपदार्थ केंद्रामधून छान वडा-पाव घेतले. एकदम छान गरम-गरम. खमंग. अजून घ्यावे वाटत होते पण भेळ खायला निघालो होतो नं. आमच्या नेहमीच्या भेळपुरीच्या दुकानात गेलो. दुकान तसे प्रसिद्ध असल्याने दुकानात बरीच गर्दी होती. काही लोक बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसले होते, काही उभ्यानच खात होते आणि काही रांगेत उभे होते. मी २ रिकाम्या दिसणाऱ्या खुर्च्याकडे वळलो. आईला बसायला सांगून भेळ घेण्यासाठी रांगेत उभा राहिलो. थोड्या वेळान माझा नंबर आला. भेळ तयार करणाऱ्या मुलाला मी सांगितलं, "दादा, एक मस्त झणझणीत भेळ कर आणि एक मिडीयम बनव." तो पण कामाला लागला. चिंचेच्या पाण्याचा, हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा मस्त वास येत होता. "आहा, आज मस्त ताव मारायचा भेळेवर" मी मनोमन पक्के केले. खूप दिवसांनी असा योग आला होता. थोड्याच वेळात मस्त शेव, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कैरी अश्या जिन्नसांची रेलचेल असलेलं गार्निशिंग केलेली, बघताच जिभेला पाणी सुटेल अशी भेळ दोन डिशमध्ये समोर आली. मी दोन्ही डिश घेऊन बाहेर आई जिथे बसली होती तिथे पोचलो. एक डिश तिच्या हाती देऊन बाजूच्या खुर्चीवर आसनस्थ झालो.

भेळ खरचं छान जमली होती. भेळ खाताखाता आम्ही आजूबाजूला रस्त्यावर काय चालू आहे ते बघत होतो. वर्दळ जशीच्या तशी होती. महिला-पुरुष सर्व कसल्यातरी घाई-गडबडीत चालले होते. प्रत्येकाला पुढे जायची घाई आणि त्यातून त्यांचा आणि इतरांचा उडलेला गोंधळ. काही शिस्तबद्ध तर काही बेशिस्त वाहनचालक. आमच्या समोर दुकानाच्या पायऱ्यांच्या बाजूला एक महिला तिच्या दोन मुलांसह बसली होती. पतीराज बहुदा भेळ घ्यायला दुकानात गेले असावेत. ती मस्त मुलांबरोबर गप्पा मारत होती. तेवढ्यात तिचे पतीराज हातात २-३ प्लेट्स घेऊन आले. एक तिच्या हातात दिली आणि बाकी मुलांच्या हातात. परत आत गेले. ती महिला आणि मुल प्लेटमधील पदार्थ खाऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. छान एन्जॉय करत होते ते. पतीराज परत आले. बसायला खुर्ची शोधायला लागले. एकही खुर्ची बसायला शिल्लक नव्हती. त्यांनी जरा इकडे-तिकडे बघितलं आणि बायकोला म्हणाले, "तू एक काम कर इकडे पायरीवर बस. मी खुर्चीवर बसतो." बायको हातातली प्लेट सांभाळत खुर्चीतून उठली आणि पायरीवर बसली. पतीराज खुर्चीत स्थानापन्न झाले. पायरीवरून अनेक लोक जात-येत होते, महिला थोडी अवघडून बसली होती. पतीराज मात्र हातातली प्लेट संपवण्यात मग्न झाले होते. त्यांची निम्मी प्लेट रिकामी झाली असेल तोच त्यांचा मोबाईल ओरडला. पतीराजांनी पुन्हा इकडे-तिकडे पहिले. आणि आपली प्लेट बायकोच्या हाती देत त्यांनी मोबाईल कानाला लावला. "हा..बोल.... नाही जरा बाहेर आल्तो. काय? अरे नाय आज महिला दिन हाये ना म्हनून बायकोला आनी मुलांना बाहेर घेऊन आल्तो." मी पायरीवर अवघडून बसलेल्या त्याच्या बायकोकडे आणि आरामात बसलेल्या त्याच्याकडे पाहिलं आणि माझी मान (मन) दुसरीकडे वळवली.

रस्त्यावर आता काही अंतरावर फुगे विकणाऱ्या महिला-मुली उभ्या होत्या. रंगीबेरंगी फुगे मनाला शांत करत होते. आनंद देत होते. मन वयानी लहान होत होते. माझ्या मागे बसलेल्या कुटुंबातील मुलांनी फुग्यांचा हट्ट सुरु केला. त्याच्या आईने एका फुगेवालीला बोलावले. साधारण १४-१५ वर्षांची ती मुलगी पुढे आली. कळकट्ट, धुळीने माखलेले कपडे, विस्कटलेले अस्ताव्यस्त केस, भुकेने अशक्तपणाने पांढरे झालेले डोळे आणि दिन हास्य. असा त्या मुलीचा अवतार होता. ती मुलगी फुगे दाखवू लागली. एक पाच रुपयाचा, एक दहा रुपयाचा तर एक वीस रुपयाचा. लाल, निळे, हिरवे असे तीन रंगातले फुगे तिच्याकडे होते. मुलांची आई तिच्याशी भाव करू लागली. विसचा फुगा दहा ला दे म्हणू लागली. त्यांचा हा संवाद चालू होता तेवढ्यात दुकानाच्या काउंटरवरील माणूस एकदम पुढे आला. "ए चल पुढे हो. इथे नको थांबू. चल जा पुढे. निघ. आणि परत नको येऊ. कटकट साली. रोजची कटकट झालीये." असे म्हणून फुगेवालीला हकलू लागला. ती मुलगी त्याला सांगू लागली, "दादा, या ताईंनी बोलावलं म्हणून आले." फुगे विकत घेणारी बाई गप्प. तो माणूस पुन्हा ओरडला, "ए, माहितीये चल हो पुढ. यांना सगळे फुकट हवे, येतात भिका मागायला" मुलगी घाबरली. थोडी मागे सरकली. तशी विकत घेणारी बाई म्हणली, "ए दे दहावाले दोन." दुकानातला माणूस पुन्हा काउंटरवर गेला. फुगेवालीन दोन फुगे दिले आणि वीस रुपये घेऊन ती आणि तिच्या बरोबरच्या इतर फुगेवाल्या पुढे गेल्या.

माझी भेळ संपली होती. मी समोरच्या पायरीवर बसलेल्या महिलेकडे, फुगे विकत घेणाऱ्या बाईकडे, दुकानाबाहेर फुटपथावर अनधिकृतपणे मांडलेल्या खुर्चीकडे आणि पाठमोऱ्या कष्टाळू फुगेवालीकडे बघत होतो.  मला कळतच नव्हते कोणाचे हात कष्ट करणारे आणि कोणाचे फुकटे. तेवढ्यात बाजूच्या खुर्चीवरची मुलगी कोणाशी तरी मोबाईलवर बोलताना म्हणाली, "अग, आज वूमन्स डे आहे नं म्हणून तो म्हणला चल पाणीपुरी खाऊ..."

मी आईला म्हणलो, "आजही महिला दीन आहे".

मी आणि आई उठून गाडीकडे चालायला लागलो....



Tuesday, January 26, 2016

दिवाळी अंक- रानमेवा

दिवाळी आली कि सर्वांना वेध लागतात ते फटाके, फराळ, नवे कपडे, मोती साबणाचे अभ्यंग स्नान... इत्यादी गोष्टींचे. मला मात्र वेध लागलेले असतात ते दिवाळी अंकांचे. माझे वडील दिवाळीत हे अंक घेऊन यायचे. त्यांना प्रेमाने कव्हर घालायचे आणि मग आम्हाला वाचायला द्यायचे. त्यांची हि नियमितता आम्हालाही एक सवय लावून गेली. दिवाळी अंक वाचायची. त्यांचा आस्वाद घेण्याची.

धनंजय, चंद्रकांत, मौज, जत्रा, मेनका, माहेर, शतायुषी, छावा, मोहिनी, सत्याग्रही, किशोर, ग्रहांकित, भाग्यसंकेत, ग्राहकहित, उत्तम कथा, ऋतुरंग, अंतर्नाद, छंद, आवाज, दीपावली, दीर्घायू, दिवाळी फराळ, हंस, नवलकथा, गंधाली अशी एक ना अनेक विषयांवरचे दिवाळी अंक बाजारात येतात आणि माझी पावले दुकानाकडे वळतात.


अप्पा बळवंत चौक. या ठिकाणी गेलं कि लक्षवेधून घेतात ते दुकानाबाहेरील मोठ-मोठे जाहिरात फलक. विविध दिवाळी अंकांच्या जाहिराती. काही संच विकत घेतल्यास १० ते २० टक्के सवलत. मी आपसूक या दुकानाकडे ओढला जातो आणि अंक चाळण्यास सुरुवात करतो. थोड्याच वेळात माझ्या हातातल्या अंकांचे वजन वाढते आणि दुकानदार स्वतः पुढे येऊन मदत करायला लागतो. मोठ गिऱ्हाईक आलं हि भावना त्याच्या मनात आणि वा काय छान वाटतंय सगळ्यांसमोर स्वतः दुकानदार आपलं ओझ घेऊन उभा आहे हि भावना माझ्या मनात. दोघेही खुश.


या दिवाळी अंकात असे असते तरी काय? यात असतात उद्याचे काही नवोन्मेश असलेले लेखक आणि आजचे मातब्बर यांची जुगलबंदी. काही कालच्या आजच्या समस्यांवर लिहिणारे काही निखळ मनोरंजन करणारे काही सामाजिक भान असलेले तर काही घाबरवून टाकणाऱ्या रहस्यमय गंभीर कथा कादंबऱ्या लिहिणारे. काहींच्या हलक्या फुलक्या कविता तर काहींचे विनोद. सगळ्यांची उठाठेव एकाच गोष्टीसाठी ती म्हणजे व्यक्त होण्यासाठी मिळणारे व्यासपीठ. मोठ्या लेखकांना या छोट्या व्यासपीठाची गरज असते ती नवीन वाचक मिळण्यासाठी आणि काही वेळेस त्यांच्या अप्रकाशित साहित्याला दाम मिळवून देण्यासाठी. छोटे नवोदित लेखक शोधात असतात ते या माध्यमातून मिळणाऱ्या बिदागीच्या आणि वाचक वर्गाच्या. पण काही असेही लेखक आहेत जे अपवाद आहेत या दोन्हीला. हे लेखक फक्त मासिक अथवा दिवाळी अंकांसाठीच लिहित असतात. त्यांना दाम आणि वाचक दोन्हीपेक्षा समाधान हवे असते. आपले लेखन मासिकामध्ये छापून येणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे असते. हे म्हणजे साहित्याचा रानमेवा असल्यासारखे आहे. एखादे फळ आंबट, एखादे तुरट, गोड, कडू. पण प्रत्येकामध्ये एक उर्जा. एक व्हिटामिन. मनाला उभारी देणारी, आनंद देणारी प्रेरणा.


माझी खरेदी झाल्यावर दुकानदार स्वतः नवीन वर्षाची दिनदर्शिका किंवा एखादे पॉकेट प्लॅनर माझ्या हातात ठेवतो आणि पुन्हा या असे आर्जवी निमंत्रण देतो. आपण कोणीतरी खूप मोठे असल्याचे उगाच वाटते आणि मी बाहेर पडतो.


घरी आलो कि प्रत्येक अंकात काय दडलय हे पाहिल्याशिवाय मला झोप लागत नाही. मग चालू होतो तो दिनक्रम. पण यातही मी रोज एक तरी कथा वाचायचा नियम पाळतो आणि पुढचे काही महिने मी याच साहित्याच्या रानमेव्यावर जगतो. पुढच्या दिवाळी पर्यंत. पुढच्या रानमेव्यावर ताव मारण्यासाठी पुन्हा तयार.



    

Friday, August 2, 2013

Main Wo nahi....

While looking around I just came to know that, why someone avoid you (inside of me). And the process reached to few lines to know why someone can be with me. It's not all done but it's what I can write down at least.






Main Wo nahi Jiske saath aap sharaab ke nashe me zum sake,
Lekin kabhi barishme mere saath zum ke to dekho, sharaab ka nasha bhul jaaoge.

Main Wo nahi Jiske saath aap cigarette ke dhue me apna dard udaa sake,
Lekin kabhi dil ka dard juban pe la ke to dekho, cigarette ka dhuan bhul jaaoge.

Main Wo nahi Jiske saath aap "himesh reshmiya" sun sake,
Lekin kabhi "baiju baawara" sun ke to dekho, awaaj me dard jaan jaaoge.

Main Wo nahi Jiske saath aap Jacky chain ki fight dekh sake,
Lekin kabhi satyajit ray ki film aramse baith ke to dekho, jindagi ki asliyat jaan jaaoge.


Main Wo nahi Jiske saath aap multiplex ki zagmagahat dekh sake,
Lekin kabhi circus ka show bhid me baith ke to dekho, multiplex ki chandani  bhul jaaoge.




Wednesday, May 8, 2013

Hellcat / Flash CS7


There is a good news for all Flash Lovers and Professionals...

Adobe Flash team is working on next version of Flash Hellcat. 
Yes it sounds something different "Hellcat". But Adobe is trying to give something different in this version.

Adobe's Sr. Product Manager Tom Barclay revealed first look of Hellcat. 


Few Features
64 Bit
Adobe Systems is working on 64 bit flash CS7 (hellcat) with which you can get good performance and speed.

Retina Display
Apple Mac Book Pro user can enjoy Retina Display in Flash and Photoshop.

Launching Time
Yes, at last Adobe heard customers. Its new flash version will be 10 times more faster than CS6. Tom Barclay showed it launching in just 2 seconds. I hope final version will also keep the same speed.


Interface
New interface is being developed to support light and dark things. High resolution for Retina Display.



Although Adobe has not yet finalized launch of Hellcat, I am very eager to know more and use this new version of flash. 



Source: tv.adobe.com

Sunday, January 20, 2013

प्रकाश


प्रकाश बसला होता तिथून समोर सगळीकडे राख पसरली होती. प्रकाशच्या चेहऱ्यावर एकप्रकारची निराशा व्यापली होती. सकाळपासूनच तो इथे येऊन बसला होता. दुपारच्या रणरणत्या उन्हात सुद्धा त्याला कोणतीच जाणीव नव्हती. तहान भूक सगळं काही तो विसरून गेला होता. म्हातारा बाप आपल्या शोधात फिरत असेल, त्यान आपला लहानपणापासूनचा मित्र सदाला त्याच्या पानाच्या दुकानावर जाऊन आपल्याबद्दल विचारलं असेल “बा सदा, परकाश्ला कुट पाहिलं गा?”, बा नं लहानग्या कृष्णाला आपल्याला शोधायला पाठवलं असेल, आणि शोधून शोधून थकून शेवटी घरातल्या सगळ्यांनी थोडंस भूकेपोटी खाऊन घेतलं असेल, यापैकी कोणतीच गोष्ट त्याच्या मनाला भेडसावत नव्हती. आता दुपारचे चार-साडेचार होत आले होते. त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा ओघळून आता वाळल्या होत्या. त्याचा काळसर चेहरा पूर्ण निस्तेज झाला होता. डोळे तीन चार दिवस झोपही न झाल्याची साक्ष देत होते. तीस वर्षाचा प्रकाश आता चाळीस-पंचेचाळीसचा भासत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याच भावना प्रकट होत नव्हत्या. जसे काही जगातील सर्व भाव भावना मृत पावल्या आहेत असंच वाटत होत त्याच्या चेहऱ्यावरून. त्याच्या त्या निश्चल आकृतीकडे पाहून जणू काही वाराही त्या ठिकाणी निश्चल झाला होता. आजूबाजूची झाडे ज्यांनी त्याला लहानाचा मोठा होताना पाहिलं होता तीही निश्चल होती. आजूबाजूला कोणतीच हालचाल नव्हती. प्रकाशच्या डोक्यातले विचारच जणू त्यांना कळले होते. अचानक या सर्व स्तब्ध वातावरणाला छेद देत प्रकाश उठला. तो ज्या वेगाने उठला तेवढ्याच वेगाने चालत निघाला. त्याने त्याच्याच मनाशी काहीतरी घट्ट विणलं होता. त्याचा विचार पक्का झाला होता. त्याचा प्रत्येक अवयव त्याच्या निर्णयाशी बांधील असल्याची प्रतिज्ञा केल्यागतं त्याच्यासमवेत चालत असल्याचे भासत होते.



प्रकाश त्याच्या बा चा एकुलता एक मुलगा. त्याच्या बा नं लहानपणापासूनच त्याच्यावर चांगले संस्कार केले होते. गरिबी असली तरी मनानी श्रीमंत राहायला शिकवलं होत. दुसऱ्यांना मदत करायला शिकवलं होत. त्याच्या बा लाही त्याच खूप कौतुक होत. तो जे मागेल त्यापैकी जे शक्य होईल ते सर्व त्याचा बा त्याला आणून देत असे. त्याच्या बा ची
एकाच इच्छा होती प्रकाश नी शिकून खूप मोठ्ठं व्हावं. आभाळा एवढं. प्रकाशही तसा हुशार होता. शाळा सुटल्यावर इतर मुलांसारखा तो गावभर उनाडक्या करत फिरत नसे. त्याच्या बा ला शेतावर जाऊन मदत करत असे. त्याला मित्रही फार नव्हते. एकच काय तो सदा. रोज संध्याकाळी ते दोघं गावच्या मंदिराजवळच्या मैदानात खेळत असत. मग सात
वाजता मंदिरात कीर्तन ऐकायला जात. आणि आपापल्या घरी परतत. घरी आल्यावर प्रकाश त्याच्या आईला मंदिरात त्या दिवशी बुवांनी काय सांगितलं ते सांगत असे. आणि जेवून बा बरोबर बाहेरच्या बाजल्यावर आकाशातले तारे न्याहाळत झोपत असे.



प्रकाश चांगला ग्रज्युएट झाला. त्याच्या बा ची इच्छा होती कि त्याने इंजिनिअर व्हावं. पण पहिल्या वर्षी शेतकी महाविद्यालयात शिकत असतानाच वर खर्चाला आधार म्हणून प्रकाश प्रोफेसर जोशी म्हणजे कृषी संशोधन क्षेत्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व. साधारण सत्तरीला आलेले. तरुणपणात अनेक मोठ-मोठ्या कृषी परिषदा- संमेलने देशात आणि परदेशांत गाजवलेले प्रोफेसर जोशी अतिशय साधे होते. पण मोठ-मोठ्या राजकीय पुढारी, संशोधक, विचारवंत यांच्यात त्यांना खूप आदर होता. त्याच कारणही तसच होत. ते म्हणजे त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले बहुमोल योगदान. अनेक शोध लावून त्यातील एकावरही हक्क न सांगता सगळे संशोधन सर्वांना खुल करताना त्यांना असं एकदाही वाटलं नाही की हे जर मी कोणत्या नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सादर केले तर मला एखादा पुरस्कार वगैरे मिळेल. म्हणूनच अनेक शोध लावूनही त्यांच्याजवळ एकाही डॉक्टरेट नव्हती. काही विद्यापीठांनी देऊ केलेली डॉक्टरेटसुद्धा त्यांनी नाकारली होती. त्यांचे म्हणणे एकच होते “माझे संशोधन हि माझी हौस आहे आणि निसर्गानी दिलेल्या फुकटच्या ठेव्यावर हक्क सांगणारा मी कोण?” प्रकाश तसा त्यांना फार ओळखत नव्हता. खेड्यातून आलेल्या माणसाला भारी सुटातला माणूस दिसला तरच तो कोणी मोठा आहे असेच वाटते. प्रकाशही प्रोफेसर जोशींच्या बाह्यरूपाने फसला. त्याला वाटले आपले काहीतरी चुकले म्हणूनच मालकांनी आपल्याला काढले असणार. त्यात भरीस भर म्हणून काय तर प्रकाश जेव्हा प्रोफेसर जोशींच्या बंगलीवर पोहोचला तेव्हा तिचा अवतार पाहून तर त्याची खात्रीच पटली. त्याने मनोमन ठरवून टाकले की दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधायची.



प्रोफेसर जोशी यांची कार्यशाळा तशी छोटीशीच होती. पाषणच्या टेकडीजवळच त्यांची बंगली होती. खरतर पाषण परिसराला न शोभेल अशीच ती बंगली होती. आजूबाजूला सर्व सोयीनी सुसज्ज असे मोठे बंगले, त्यांचे विविध रंगी फुलांनी सजलेले आवार, आलिशान गाड्या आणि त्यामध्ये एक जुनाट लाकडी दार-खिडक्या असलेली, आजूबाजूला खुरटी झाडी आणि गवत वाढलेली प्रोफेसर जोशी यांची कौलारू दुमजली बंगली. या बंगलीमध्ये प्रोफेसर जोशी एकटेच रहात. त्यांची खोली बंगलीच्या वरच्या मजल्यावर होती. अगदी छोटीशी. एक टेबल-खुर्ची, जुनाट लोखंडी कॉट, लाकडी कपाट आणि पाण्याने भरलेला माठ. त्यांचे कपडे सदैव या खोलीच्या दाराला लटकवलेल्या अवस्थेत असायचे किंवा खोलीत बांधलेल्या एकमेव दोरीवर. कपाटाचा उपयोग हा साधारणपणे त्यांचे शोधनिबंध ठेवण्यासाठी किंवा काही प्रिय व्यक्तींनी दिलेल्या वस्तू ठेवण्यासाठीच होत होता.



प्रकाशला शेतीतच रस होता. बाचा विरोध डावलून त्यान शेतीतच पदवी मिळवायचं ठरवलं होत. त्यानंतर पुण्याच्या शेतकी महाविद्यालयातून त्याने डिग्री मिळवली होती. ती सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये. पुण्यातल्या बाजीराव रोडवरील एका बी बियाणाच्या दुकानात संध्याकाळी काम करत असे. बी-बियाणाचे वजन करून त्याचे लहान मोठे पुडे करून ठेवणे, आलेला माल व विक्री यांचा मेळ घालणे, नवीन उत्पादने तसेच हंगामी उत्पादने दर्शनी भागात दिसतील अशी मांडून ठेवणे हा प्रकाशचा गिऱ्हाईक नसतानाचा फावल्या वेळातील उद्योग. मालकांना कधी काही सांगावच लागायचं नाही. प्रशांतची कामातली हुशारी आणि चिकाटी पाहून मालक खुश होते. प्रकाश पहिल्या वर्षी चांगल्या गुणांनी पास झाल्यावर त्यांनीच त्याची त्यांच्या ओळखीच्या एका कृषीतज्ञाशी ओळख करून दिली. आणि उद्यापासून माझ्या दुकानात यायचं नाही असं बजावलं. प्रकाशला प्रश्नच पडला आता काय करायचं? त्याची घालमेल पाहून ते कृषीतज्ञ त्याला हसून म्हणाले “अरे म्हणजे आजपासून तू माझ्याबरोबर माझ्या प्रयोगशाळेत काम करायचे". झाल दुसऱ्या दिवसापासून प्रकाश त्या कृषीतज्ञांच्या म्हणजे प्रोफेसर जोशी यांच्या प्रयोगशाळेत रुजू झाला.







( क्रमशः - हा एक प्रयत्न आहे एक वास्तववादी कथा सांगण्याचा. अनेकांच्या आयुष्यात असे प्रकाश येतात आणि जातात. त्यांना मार्ग कोणीच दाखवीत नसते. कारण मार्ग ज्याचा त्यानी शोधायचा असतो. )

पुढील भाग वाचण्याची इच्छा असेल तर "join this site" या बटणावर क्लिक करा किंवा आपल्या गुगल अकाऊंटने आपल्या सर्कलमध्ये समाविष्ट करा. पोस्ट अपडेट झाल्यावर आपल्याला लगेच समजेल.

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

धन्यवाद.

Monday, December 10, 2012

माझा पहिला विमानप्रवास..


दिल्ली. आपल्या भारताची राजधानी. काही दिवसापूर्वी या दिल्लीला भेट देण्याचा योग आला. तसा मी फार काही बाहेर फिरलेलो नाही. महाराष्ट्राच्या बाहेर तर जाण्याची हि माझी, बंगलोर- हैद्राबाद नंतर तिसरी वेळ होती.


आमच्या ऑफिसतर्फे, एका सेमिनारला जाण्यासाठी आम्ही काही जण पुण्याहून विमानाने दिल्लीला निघालो. विमानप्रवासपण पहिलाच असल्याने तशी थोडी भीती वाटत होतीच. आपल्या पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आम्ही साडेदहाला पोचलो. आमचं विमान अकरा वाजून वीस मिनिटांनी सुटणार होत. चौकशी केल्यावर समजले कि, ते आता बारा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे. "झालं पहिलीच नाट् लागली..." असा विचार करायचा नाही म्हणलं तरी डोक्यात आलाच. थोडा वेळ विमानतळाबाहेरच बरोबर सोडायला आलेल्या मंडळींबरोबर गप्पा मारून, साडे अकराला आम्ही आत गेलो. तिथे ठिकठिकाणी कमांडो उभे होते. आलेल्या प्रवाश्यांच चेकिंग करण्यात ते सर्व मग्न होते. आमचं विमान ज्या कंपनीच होत त्यांच्या काउंटरवर आम्ही जाऊन आमच्या सुटकेस जमा केल्या. तिथल्या परिचारिकेने हसतमुखाने आम्हाला आमचे बोर्डिंग पास दिले आणि आम्ही पुढे गेलो. तिथे कमांडो आमचं चेकिंग करणार होते. त्याआधी आम्हाला आमच्या बरोबर असलेल्या पिशव्यांना तिथले बॅजेस लावायचे होते. एवढी सुरक्षा रक्षकांची फौज पाहूनच गांगरून जायला झालं. एक तर विमान प्रवासाची मनातली भीती त्यातून मख्ख चेहऱ्यांनी काम करणारे कमांडो. एक माणूस किती ताण सहन करणार. पण एकदाच ते चेकिंग झालं. तिथून पुढे गेल्यावर बसायला जागा होती. आम्ही तिथे स्थानापन्न झालो. थोड्या वेळानी आमचे विमान आम्हाला समोरून येताना दिसले. लोकांची रांग लावण्याची धावपळ सुरू झाली. आम्ही आमच्याच जागी बसून राहिलो. “उगाच घाई कशाला? शेवटी विमानात चढलो तरी आपली जागा ठरलेली आहे. ती काय पुण्याची PMPML आहे, धावत जाऊन जागा पकडायला?” लोक एक एक करून आपलं तिकीट आणि बोर्डिंग पास परिचारिकेला दाखवून विमानाकडे जात होते. रांग कमी झाल्यावर आम्ही जाऊन उभे राहिलो. परिचारिकेला तिकीटं दाखवली आणि विमानाकडे प्रस्थान केलं.


विमानाच्या शिडीपाशी पोहचलो तिथून वर पाहिलं आणि धड-धड अजूनच वाढली. शिडी चढून वर गेल्यावर एका छानश्या हवाई सुंदरीनी Good Afternoon Sir...” असं तिच्या मंजुळ आवाजात स्वागत केलं. एवढ्या गोड आणि लाडिक आवाजात कुणी आपलं स्वागत करण्याची अपेक्षाच नसल्याने काय बोलावं हे सुचून मी तिला फक्त एक स्माईल दिल आणि पुढे गेलो. क्षणभर एक विचार मनात येऊन गेला, “बोकड कापायच्या आधी कसं, त्याच वाजत गाजत स्वागत करतात, तस आपलं स्वागत झाल का?” पण मग विचार केला नाही नाही..हि पण याच विमानात असणार..त्यामुळे विमान पडले तरी हिच्यासाकटच पडेल. हि काय त्या उद्देशांनी नाही स्वागत करते.”

माझी जागा खिडकीपाशी होती. मी माझ्या जागेवर बसलो. खिडकीमधून बाहेर पाहिलं तर विमानाचा पंख मला व्यवस्थित दिसत होता. तो थोडासा माझ्या खिडकीपासून पुढे होता. मला वर गेल्यावर...म्हणजे विमानाने आकाशात गेल्यावर खालची दृश्ये निट दिसणार होती. विमानाचे दरवाजे सर्व प्रवासी चढल्यावर लावले गेले. शिडी बाजूला झाली होती. विमानाची घर घर सुरू झाली. फार नाही पण बऱ्यापैकी इंजिनाचा आवाज ऐकू येत होता. समोर थोड्या थोड्या अंतराने दोन हवाई सुंदऱ्या उभ्या राहिल्या होत्या. आणि त्यांनी क्रीपया ध्यान दे...अपने कुर्सी कि पेटी बां ले... या बेसूर वाटणाऱ्या कोणाच्या तरी आवाजावर खुर्चीचा पट्टा सा बांधायचा याच प्रात्यक्षीक दाखवण्यास सुरुवात केली. त्यांचा एकंदर पेहेराव, मेकअप, डोळ्यात घातलेलेल आणि बाहेर आलेल काजळ, डार्क लिपस्टिक, चप्पट बसवलेले क्लिप लावलेले केस, इत्यादी पाहून मला त्या कठपुतळी असल्यासारख्या वाटू लागल्या. विमानात फुकटचा कठपुतळ्यांचा शो दाखवायचे ठरविले तरी त्यांना अगदी सहज ते काम करता येईल असे वाटले.

हवाई सुंदरीच्या कवायतीला कंटाळून मी माझ्या खुर्चीचा पट्टा बांधून घेत बाहेर पाहू लागलो. विमान आता धावपट्टीकडे निघाले होते. आणि माझे लक्ष विमानाच्या त्याच पंखाकडे गेले जो मघा मी खिडकीतून पहिला होता. अरे देवा.. हे काय पाहतोय मी? मला एवढ्यात मरायचे नाही...वाचव हा शेवटचा वाचव.. शब्द जर मनातून ओठात आला असता तर...


विमानाचा तो पंख मी हलताना पाहत होतो. त्याची वर-खाली अशी होणारी हालचाल पाहून मला असं वाटत होत कि इंजिनीयरनी याचे स्क्रू पिळलेले दिसत नाही. विसरला कि काय? मी मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलो. विमान धावपट्टीवर स्थिरावले. मला वाटले चूक लक्षात येऊन विमानाच्या ड्रायव्हरने थांबविले असेल. मी थोडे बंद केलेले डोळे उघडून बाहेर पाहायला लागलो. बाहेर त्या पंखातून अजून छोटे पंख थोडेसे गोलाकार बाहेर येत होते आणि अचानक, त्या स्थिरावलेल्या विमानाने प्रचंड आवाज करत वेगाने धावायला सुरुवात केली


विमानाचा वेग सेकांदागणीक वाढतच होता. मला मोठ्यांनी ओरडून सगळ्यांना सांगाव वाटत होतं अरे या विमानाचे पंख निट बसवलेले नाहीत...थांबवा हे विमान. पण मुळातच भिडस्त स्वभावाने उचल खाल्ली आणि मी मनातल्या मनात देवाचा धावा करत बसून राहिलो. राहून राहून सारखे वाटत होते, लहानपणी जत्रेतल्या उंच पाळण्यात बसल्यावर यायचा तसा आता पोटात गोळा येणार, नाहीतर उलटी तरी होणार. बाहेरचे जग तिरके होऊन हळू हळू सरळ होऊ लागले होते. आता वरून खालचं पुणं दिसत होत.

हवाई सुंदरींनी खुर्चीची पेटी म्हणजे पट्टा काढण्यास हरकत नाही असे सांगितले आणि मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. पंख आहे तिथेच आहे, आपली खुर्ची जागेवरच आहे, शेजारचे सर्व जागेवर आहेत, हवाईसुंदरी समोर जिवंत दिसतीये, विमान पडले नाही, उलटी झाली नाही, पोटात कसलीच वेगळी जाणीव नाही. "अरे.., मी उगाच घाबरलो होतो." विमान वर जाताना खाली दिसणाऱ्या दृश्यांना मी मुकलो होतो. तो आनंद मी निट घेऊ शकलो नव्हतो. मी खुर्चीचा पट्टा काढला. बाहेर पाहिल्यावर मला एक्सप्रेस वे दिसला. "वॉव एक्सप्रेस वे. वरून असा दिसतो?" मला माझा कॅमेरा आठवला. मी लगेच तो पाउचमधून काढला आणि बाहेरचे फोटो काढू लागलो. मघाचा तो विमानाचा पंख आता सूर्यकिरणांनी उजळला होता. मी त्याचे काही फोटो काढले आणि खाली पाहू लागलो. आम्ही हळू हळू ओढे, नद्यानाले, डोंगर, लहान मोठी घरे इमारती असे एक एक पार करत पुढे चाललो होतो. थोड्या वेळानी समुद्र दिसू लागला. अरे ड्रायव्हर चुकला कि काय? आता तुम्ही म्हणाल कि हा काय सारखा पायलटला ड्रायव्हर म्हणतोय? पण मुळातच माझा पायलट या नावाला विरोध आहे. माझ्या मते विमानात बसल्यावर ज्याचे पाय लट लट कापायला लागतात तो पायलट. विमान चालवणारा म्हणजे ड्राइव्ह करणारा तो ड्रायव्हर.

तर हा ड्रायव्हर चुकला कि काय? अशी शंका माझ्या मनात आली. बर विमानाला PMPML सारखी पाटीपण नसतेस्वारगेटसनसिटीशीपुणेदिल्ली”. नाहीतर मी त्याचा कान धरून दाखवून त्यास सांगितले असतेगाढवा निदान पाटी पाहून तरी विमान चालवीत जा.” हा विचार येताच मनातच एक नक्की केले कि, दिल्लीला गेल्यावर परिवहनमंत्री का कोण जे असतात त्यांना भेटून विमानाला पाटी लावयची विनंती करायची. माझे हे विचारचक्र चालू असतानाच विमानाने समुद्राकडे जाण्याची दिशा बदलून एक वळण घेतले, “चूक आली वाटत ड्रायव्हरच्या लक्षातमला लगेच हायसं वाटल. मी पुन्हा खाली पाहू लागलो.

हॉलीवूडच्या चित्रपटात जेव्हा विमानातून खालचे दाखवतात तेव्हा खालच्या नद्या समुद्र कसे छान निळे किंवा हिरवे दिसते, आपल्याकडे मात्र गढूळ दिसते. मला आता खाली एक धरण दिसत होते. तेही असेच गढूळ. चारपाच प्रवाह त्याला येऊन मिळाल्यासारखे भासत होते. मी मनातल्यामनात म्हणलो, "हं, हे नक्कीच गुजरात असणार." कारण, आपल्या पुण्या-मुंबईच्या नद्या गढूळ नाही तर काळ्या दिसतात. नदी नव्हे मोठी गटारेच असतात. त्यातल्या अस्वच्छ पाण्याची आठवण होते तोच हवाईसुंदरी मिनरल वॉटर घेऊन आली, "सर, मिनरल वॉटर?" मी म्हणलो, "फॉर हाऊ मच?" खरेतर बाटलीच रूप पाहून मनातल्या मनात हेच म्हणत होतो की "बाई हे खरच मिनरल वॉटर आहे का? की अजून काही? तुमचं काय जातंय. पाजाल काहीही मिनरल वॉटरच्या नावाखाली. नाहीतरी तुमच्यापैकीच एकाची कंपनी आहे नं. मग काय विमानात बसलेल्यांना लावायची सवय या असल्या मिनरल वॉटरची." पण माझी ही विचारशृंखला तोडत ती काहीसं हसून म्हणाली "इट्स फ्री सर्". मी लगेच "टू प्लीज." आता एवढे महागाचे तिकीट काढल्यावर फ्री मिळतंय तर घेऊन टाकावे. बर् अजूनही खाली धडधाकट उतरण्याची शाश्वती नव्हती. मग मरायच्या आधी पैसे तरी वसूल करावे म्हणून म्हणलो "दे दोन" बाकी काही नाही. तशीही मघाच्या भीतीने घशाला कोरड पडली होतीच.

पुढच्या दोन मिनिटांत मी दोन्ही बाटल्या रिकाम्या केल्या आणि बाजूला पहिले तर माझ्या बाजूचा इसम "कुठून आलंय हे ध्यान?" अशा मुद्रेने पाहत होता. मी एक मंदस स्माईल देत ओशाळून पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागलो. तेवढ्यात, "एकस्युज मी सर्" असा आवाज कानी पडला. वळून पहिले तर एक हवाईसुंदरा. होय हवाईसुंदराच. विमानात यांना मेल फ्लाईट अटेंडंट म्हणतात. त्यानेही मेकअप केल्याचे मला दिसले. तेल किंवा जेल लावून चप्प बसवलेले केस. कोरलेल्या भुवया. त्याही काळ्या कुळ-कुळीत. गुलाबी ओठ. कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट आणि काळा-निळा टाय. मी त्याच्याकडे पाहिल्यावर मला म्हणाला, "सर् एनी ड्रिंक सर्?" माझा आपला पुन्हा तोच प्रश्न, "फॉर हाऊ मच?". "सर् इट्स कॉम्प्लिमेंटरी सर्" तो म्हणाला. दोन मिनिट तो काय बोलला हेच कळले नाही. या लोकांना स्पष्ट सांगता येत नाही का "फुकट... आहे". एक तर यांचे आंग्ल उच्चार त्यातून इंग्रजी भाषा आणि आम्ही पृथ्वीवरच्या दोन समांतर वस्तू. असो तर "व्हॉट इज देअर?" माझा असा प्रश्न आल्यावर हसू दाबत तो म्हणाला "सर् टी, कॉफी एंड लेमोनेड". नुकतच एवढ पाणी प्यायल्यावर पुन्हा लगेच काही घेण शक्य नव्हत म्हणून दोन लेमोनेड दे बाबा निदान नंतर तरी पिता येईल असा विचार करून मी "टू प्लीज." असं म्हणणार तेवढ्यात मला मघाचा माझ्या शेजाऱ्याचा चेहरा आठवला आणि तोंडून फक्त "वन लेमोनेड प्लीज" एवढंच बाहेर आलं. माझ्या शेजारचा मला लेमोनेडघेताना पाहून मनातल्या मनात "आता हेही दोन मिनिटांत संपवून तू काय पुढच्या दोन मिनिटांत धरतीवर पाउस पाडायला जाणार की काय?" असे मला विचारतोय वाटले. मी ठरवून टाकलं आता याच्याकडे बघायचंच नाही. आणि लेमोनेडची बाटली बाजूला ठेवून बाहेर पाहू लागलो.

बाहेर काही डोंगररांगा दिसत होत्या. शिल्पकाराने अगदी मन लावून एक एक दगड कोरून काढावा आणि त्यात एखाद्या वादळाचा भास निर्माण करावा तसें काहीसे खाली त्या डोंगररांगांना पाहून वाटत होते. 'वाऱ्याने कोरलेलं वादळाच शिल्पं' असे नावही मी त्याला मनातल्या मनात देऊन टाकले. मी त्याचे जमतील तेवढे फोटो काढले. पण विमान पुन्हा थोडे अस्थिर झाले होते. खालचे नीट दिसत नव्हते. विमान पुन्हा थोडेसे कलले आणि आता थोडा हिरवा रंग खाली दिसू लागला. अधून मधून हिरवे उभे-आडवे पट्टे आणि त्याला पिवळ्या-तपकिरी-काळसर कडा. म्हणजे आता शेतीचा भाग चालू झाला होता. अधून मधून आता काही रस्ते, घरे, वस्त्या, गावं, नद्या असे सर्व आखीव रेखीव दिसू लागले. काही ठिकाणी एखादा मोठा रस्ता दिसे. आणि त्याच्याबाजूला अगदी चिकटून चिकटून छोटी छोटी घरे आणि त्यांना जोडणारे रस्ते. शाळेत भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं आठवलं, "जगतील सर्वात जास्त वस्ती ही नद्यांच्या किनाऱ्यावर झाली आहे. उदाहरणार्थ नाईल नदी. कारण नद्यांचे क्षेत्र हे सुपीक जमिनीचे असते आणि त्यामुळे धन-धान्य पिकवण्यास ही जागा अनुकूल असते." मला ते वाक्य बदलून "जगातील सर्वात जास्त वस्ती ही महामार्गाच्या किनाऱ्यावर झाली आहे. उदाहरणार्थ, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे. कारण रस्त्यांचे क्षेत्र हे सधन गिऱ्हाईकांचे ठिकाण असते आणि त्यामुळे व्यापार करण्यास ही जागा अनुकूल असते."असे करावे वाटले. बघा आठवून जर कोणाला आठवत असेल तर. पूर्वी जुन्या हायवेनी पुण्याहून मुंबईला जायला पाच तास लागायचे. रस्त्यात दोन रुपयाची करवंद अथवा जांभळ, लोणावळा-कर्जत जवळ चार रुपयाचा वडा-पाव आणि दोन-तीन रुपयाचा चहा. एसटीचे तिकीट साठ-सत्तर रुपये. एकूण माणशी सत्तर-ऐशी रुपये खर्च. आता एक्सप्रेस वे झाल्याने पुणे-मुंबई अंतर कमी झाले. पण दोन रुपयाची करवंदे वीस रुपये, वडा-पाव वीस रुपये आणि चहाही वीस रुपये. सबकुछ एक भाव में! आणि एसटीच्या लाल डब्याची जागा 'शिवनेरी' ने घेतली आहे. तिकीट फक्त तीनशे वीस. एकूण खर्च चारशेच्या आसपास. प्रवासाला एकूण लागणारा वेळ चार-साडेचार तास. आता या सुविधा आल्या तर त्या पुरविणारे पण आले. आणि झाडांनी नटलेलं लोणावळा आता बंगले आणि हॉटेलनी नटले आहे. एकुणात काय, रस्ते-महामार्ग हे वस्ती करण्याचे ठिकाण झाले आहे.

एव्हाना खाली बऱ्यापैकी आखीव रेखीव रस्ते दिसू लागले होते. शेतीचे पट्टेही अगदी त्याच रस्त्यांच्या बाजूला कोरलेले दिसत होते. मधूनच काही हिरवे-निळे-पांढरे पट्टे दिसत होते. म्हणजे हा इंडस्ट्रीयल भाग असावा असा अंदाज मी बांधला. मधेच काही धूर सोडणाऱ्या मोठ-मोठ्या चिमण्या त्याची साक्ष देत होत्या. हवाईसुंदरी आणि हवाई सुंदरा दोघेही एक काळी पिशवी घेऊन पुढे-पुढे येताना दिसले. लोक त्यांत रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, चहाचे कप इत्यादी टाकत होते. मी म्हणलो "ये हुई बात" आपल्या शिवनेरी मधेही असं काहीसं करून टाकावं. गाडी कशी एकदम स्वच्छ. माझ्या शेजाऱ्याची चुळबुळ सुरु झाली. मुबईत लोकलमधून प्रवास करणारे चाकरमाने जसे त्याचं स्टेशन आलं की आवरा आवर सुरु करतात तसें त्याने वरच्या कपाटामधून त्याची बॅग काढली आणि बरोबर आणलेलं मासिक त्यांत ठेवलं. त्यातलाच एक कंगवा काढून त्याने केस नीट केले. शर्ट व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. आणि बॅगवर हात ठेवून बसला. मला त्याच फार हसू आलं. जस काही तो त्याच हवं ते ठिकाण आल्यावर विमानातून खाली उतरणार आहे. सगळ्यात आधी.

हवाईसुंदरी पुन्हा एकदा समोर येऊन उभी राहिली. पुन्हा तोच कर्णकटू आवाज येऊ लागला. क्रीपया ध्यान दे...अपने कुर्सी कि पेटी बां ले... या बेसूर वाटणाऱ्या कोणाच्या तरी आवाजावर खुर्चीचा पट्टा सा बांधायचा याच प्रात्यक्षीक त्यांनी पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. मी माझ्या खुर्चीचा पट्टा लावला आणि बाहेर पाहिलं.

अहाहा! सुंदर अप्रतिम. दृश्य इतकं विलोभनीय होत की मला फोटो काढायचेही लक्षात राहिले नाही. मी फोटो काढेपर्यंत ते दृश्य मागे गेल होत. ते होत दिल्लीच प्रसिद्ध 'लोटस टेंपल'. वरून दिसणाऱ्या त्या कमळाच्या पाकळ्या सूर्याच्या किरणांनी न्हाऊन निघाल्या होत्या. आज पहिल्यांदाच मला सूर्याचा हेवा वाटला. त्याला रोज अशी अनेक विलोभनीय दृश्ये वरून पाहता येत असणार. आता एकमेकांमध्ये गुंतलेले पूल, रस्ते उंच इमारती, यमुना नदी, मोठ-मोठ्या प्रशासकीय इमारती असे बरेच काही दिसू लागले होते. एकंदरीतच दिल्लीचं-राजधानीच  वैभव  आम्ही पाहत होतो. विमान आता तिरक झाल होत. खाली भव्य अस विमानतळ दिसत होत. पुण्याच्या विमानतळाच्यापेक्षा कितीतरी मोठ. लहान-मोठी विमानं एका ओळीत उभी होती. अगदी शिस्तीत. सामान घेऊन जाणाऱ्या गाड्या, प्रवासी  घेऊन जाणाऱ्या बस, काही कर्मचारी त्यांच्या रंगी-बेरंगी कपड्यात दिसत होते. हळू-हळू आमच्या  विमानाने खाली जाण्यास सुरुवात केली. मी मनात म्हणलो "कोसळलो..." पण एक हलकासा धक्का बसला आणि विमान धावपट्टीवरून धावायला लागलं. त्याचा वेग हळू-हळू कमी झाला आणि ते थांबलं. होय थांबलं!

मला आपण सुखरूप दिल्लीत पोचलो आहोत हे खरचं वाटत नव्हत. माझ्या शेजारचा माणूस उठून उभा राहिला. माझ्याकडे पाहिलं. हसला. आणि म्हणाला "इट वॉज नाईस जर्नी विद् यू". इतका वेळ मी ज्याच्या शेजारी बसून तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल याचा विचार करणारा मी त्यावेळेस काय बोलाव हे सुचून फक्त हसलो. आम्ही विमानातून उतरून खाली आलो. वरचं मोकळ आकाश पाहिलं आणि आपण दिल्लीला विमानाने सुरक्षित पोहोचलो याची जाणीव मला झाली. एक वेगळीच अनुभूती झाली. मंद वाऱ्याची झुळूक जशी मनाला स्पर्शून जाते तशी. दिल्लीच्या वैभवसंपन्न विमानतळाचे दर्शन घेताना मनात कुठेतरी डेक्कनचा बस स्टॉप होता, शिवाजीनगर एसटी स्टँड होता, PMPML चं लाल-पिवळ तिकीट होत, वाहकाची टिंग-टिंग वाजणारी बेल होती आणि चालकाची बाहेर टाकलेली तंबाखूची पिचकारी होती.

मित्रांनो...खरंच सांगतो विमान प्रवास जरूर करावा. ते ऐश्वर्य जरूर पहावं. अनुभवावं. पण..आपली बस किंवा एसटी कधी विसरू नये. कारण आपल्या खऱ्या मार्गाला तीच आपल्याला घेऊन जाणार असते. जमिनीवरून. घट्ट रुतलेल्या चाकांनी. हवेतली मजा थोडी आणि सोंग फार.


धन्यवाद.